Wednesday 15 August 2018

'SMS पाठवल्याने माणूस राष्ट्रप्रेमी होतो का?'

प्रिय भारतीय बहिणी व भावांनो ..! आज १५ ऑगस्ट २०१८. भारताचा ७२ वा  स्वातंत्र्य दिन... भारताला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झालीत. आपण ७१ वर्षाँपासून मोठ्या थाटात स्वातंत्र्य दिन साजरा करतो. अवघा भारत देश अगदी देशभक्तीच्या उल्हासात या दिवशी ऊर्मीत येतो. १५ ऑगस्ट जातो आणि मग देशाची परिस्थिती व भारतीयांची देशभक्ती पहावयास मिळते ती 'जैसे थे!' अशीच देशभक्ती आम्हा भारतीयांमध्ये वर्षात परत जागृत होते ती २६ जानेवारी रोजी. आणि यानंतरही जर कधी ती निर्माण झालीच तर कुण्या समाजसेवकाने क्रांतीची मशाल पेटविल्यास; पण आता तर ते ही कमी झालंय... काय आपण खरंच राष्ट्रीय सण (स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिन) साजरे करतो.. !

राष्ट्रीय सणांचा अर्थ काय? कशासाठी साजरे केले जातात राष्ट्रीय सण? 
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणा-या कितीतरी थोर-महापुरुषांना सलाम, त्या अविस्मरणीय व क्रांतीकारी दिवसाची आठवण व भविष्यात भूतकाळामध्ये भारतीयांनी जगलेली पारतंत्र्यकालीन परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून!

आजच्या अभ्यासक्रमात मूले, तरुण कितीही शिकत असले १५ ऑगस्ट व २६ जानेवारी चे महत्त्व तरी त्यांना राष्ट्रीय सणांबद्दल अधिक विचारल्यास बालकांपासून तर वृद्धांपर्यँत सर्वाँकडून एकच उत्तर मिळेल - 'राष्ट्रीय सण म्हणजे पूर्वतयारी, रंगरंगोटी, शुभेच्छा-संदेश, SMSes, व्हाट्सअप संदेश, तोरण-पताका लावून सजसजावट केलेल्या वातावरणात कूण्या पाहूण्याच्या उपस्थितीत नविन/स्वच्छ ड्रेस परिधान करून डौलात मान व शानेने उंचावर फडकत असलेल्या ध्वजाला (तिरंगी झेँडा) सलामी देणे, 'रोजच्याच' राष्ट्रगीतासह निवडक देशभक्तीगीतांमार्फत निव्वळ 'मनोरंजन' करून घेणे, मोजक्या ठिकाणी बक्षिस वितरण व मिठाई वाटपाचा केवळ एक सण! फक्त ऐकण्याच्या उद्देशाने 'टाईमपास' करवून घेण्यासाठी व्यासपीठावरील पाहूणे व निवडक विद्यार्थ्याँची भाषणे (ते ही आज कुठे घेतली/दिली जातात...?) आठवडाभराच्या वर्तमानपत्रे, साप्ताहिके व नियतकालीकांमधून राष्ट्रीय सणांबद्दलची नानाविध माहिती व देशभक्तीसाठी राष्ट्रीय प्रतीकांचा (विशेषत: ध्वज) मान राखण्यासाठी जनजागरणपर संदेश व मोहिमा... आणि चिमुरडे तर चिमुरडे सोडाच पण देशाच्या मोठ-मोठ्या जाणत्या लोकांकडून व सळसळत्या रक्ताच्या तरुण युवांकडून देखील प्लॅस्टीकचे ध्वज रस्त्यावर फेकले जातात आणि जातात पायाखाली तुडवले देखील (अर्थात याला काही अपवाद आहेत म्हणा) .. !!

म्हणून सर्वप्रथम राष्ट्रीय सण साजरा करण्यामागील मुख्य उद्देश, राष्ट्रीय प्रतीकांचे महत्त्व सांगतानाच त्यांचा मान कसा राखता येईल याचेही ज्ञान देणे आवश्यक आहे ... शिवाय राष्ट्रीय प्रतीकांचा (परिहार्याने देशाचा) अवमानच करता येऊ नये अशी काही व्यवस्था करता येईलच कि... 

सन २०१३ साली आजच्याच दिवशी लिहिलेल्या लेखात मी प्लास्टिक ध्वजावर टिप्पणी केली होती ती या लेखात नमूद करणे महत्वाचे वाटते-

"मागील तीन दिवसांपासून मी जवळपास सर्वच वृत्तपत्रात वाचतोय "प्लॅस्टीकचे तिरंगी ध्वज वापरणे टाळा." अशी वर्तमानपत्रात सूचना देण्याऐवजी प्लॅस्टीकच्या ध्वजांवरच बंदी आणली तर चालणार नाही का? काही जण मला वेड्यात काढतील तर काही प्लॅस्टीकचे ध्वज विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित करतील, असे ध्वज वापरणारे तर म्हणतील कि हे राष्ट्रप्रेम आहे... पण ध्वज विक्रेत्यांना २६ जानेवारी व १५ ऑगस्ट सोडूनही पोटा-पाण्याचा प्रश्न असतोच कि..! प्लॅस्टीकचे ध्वज वापरण्याची स्वतंत्र गरजच ती काय?? आणि जर वापरलेच जातात प्लॅस्टीकचे ध्वज तर त्यांची सन्मानपूर्वक योग्य विल्हेवाट देखील लावता येणे गरजेचे आहे ..." आता तर प्लास्टिक ध्वजांवर (आणि ५० मायक्रॉन खालील संपूर्ण प्लास्टिकवरच) बंदी असून देखील सर्वत्र सारखेच निवेदन देण्यात येत असल्याचे पाहून आश्चर्य वाटते!

आज कॉन्व्हेँटपासून तर कॉलेजपर्यँत देशभक्तीचे धडे दिले जातात; पण आजपर्यँत मी स्वत:च्या डोळ्यांनी निरीक्षण केल्यानंतर आपणास एक प्रश्न विचारू ईच्छितो- किती शिपाई, कर्मचारी शाळा-विद्यालयात राष्ट्रगीत सुरू असताना सावधान स्थितीत उभे राहतात? व किती प्राचार्य/मुख्याध्यापक त्यांना ५२ सेकंद सावधान स्थितीत उभे राहण्याची सूचना देत सावध करतात?

मी २०१४ साली प्रजासत्ताक दिनामित्त लिहिलेल्या एका लेखात त्यावर्षी नुकताच प्रदर्शित झालेला 'जय हो' चित्रपट पाहण्यासाठी स्थानिक चित्रपटगृहात गेलो असता आलेला अनुभव व्यक्त करताना लिहिले होते की; चित्रपट प्रारंभ होण्यापूर्वी वाजलेल्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहण्याची सुचना स्क्रीनवर येऊनसुद्धा प्रत्यक्ष उभे प्रेक्षक बोटांवर मोजण्याइतके होते. 

३० नोव्हेंबर २०१६ रोजी  शेवटी चक्क सर्वोच्च न्यायालयाला दखल घेत देशभरातील चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याचा व प्रेक्षकांनी सन्मानार्थ उभे राहण्याचा आदेश द्यावा लागला. खरंतर 'देर आये दुरुस्त आये' या उक्तीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत 'त्या' निवाड्याचे देशभरातील सर्व प्रसारमाध्यमांसह संपूर्ण देशवासीयांनी स्वागत करणे अपेक्षित होते; परंतू जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांनी (इलेक्ट्रॉनिक मीडिया) या स्वागतार्ह निवाड्याचा विरोध करत परिसंवाद व चर्चासत्रे आयोजित करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कसा चुकीचा आहे हेच पटवून देण्याचा अधिक प्रयत्न केला. काही वृत्तवाहिण्या व देशवासीयांनी तर 'सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला देशभक्ती शिकवू नये' अशा प्रकारच्या खोचट प्रतिक्रिया दिल्या. अर्थात सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयावर सर्वच वृत्तवाहिन्यांची भूमिका संशयास्पद व तितकीच हास्यास्पद होती. खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणजे आम्हाला देशभक्ती शिकवू नये म्हणणाऱ्या व मला चित्रपटगृहात आलेल्या अनुभवाप्रमाणे राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहणाऱ्या प्रेक्षकांसारख्या देशवासीयांसाठी अगदी डोळ्यात अंजन घालण्यासारखी बाब होती. कारण जे राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहत नाहीत अशांना विरोध करण्याचा अधिकार नाही व जे सन्मान करतात त्यांनी विरोध करण्याची आवश्यकता नव्हती. स्वतःला देशभक्त म्हणवून घेणाऱ्यांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारायला हवे होते कि "मी तरी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ ५२ सेकंद उभा राहतो/ उभी राहते का?" सर्वोच्च न्यायालयास अशा संवेदनशील प्रकरणात हस्तक्षेप का करावा लागला याचे उत्तर आपोपाप मिळाले असते. असो... माझ्या मते तर देशाच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ ५२ सेकंद उभे राहण्याचा आदेश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागते  आणि त्याचा देशभरातील वृत्तवाहिण्यांसह नागरीकांनी सुद्धा किमान समर्थन नाही तर ना सही पण चक्क विरोध करणे ही दुर्दैवी व देशासाठी यापेक्षा चिंताजनक बाब नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात  काही कमतरता असेलही परंतु ती सुधारता आली असती; पण जानेवारी २०१८ मध्ये शेवटी सर्वोच्च न्यायालयाला आपला स्वागतार्ह व देशहिताचा निर्णय मागे घ्यावा लागला हे चिंताजनक वाटते. 

२०१४ साली व्हाट्सअप व आंतरजाल (इंटरनेट) चा आजीतका प्रसार झाला नसला तरी SMS पाठवून राष्ट्रभक्ती दाखवली जायची. आता आंतरजाल चा प्रसार झाल्यानंतर तर राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे अगदी स्वरूपच बदललेय. राष्ट्रप्रेमाच्या नावावर सर्रास अफवा, चुकीची माहिती, खोटे संदेश, दिशाभूल करणारा मजकूर, समाजात तेढ व विद्रोह पसरवणारे संदेश, तंत्रज्ञान साक्षरतेच्या युगात फसवे दुवे (Spam links) पसरवल्या जातात. हे सर्व सर्व अगदी नियोजनबद्धरित्या व जाणीवपूर्वक सुरु झालेले असते. अशा संदेशांची सत्यता अगदी एका टिचकीवर (क्लिक) पडताळता येणे शक्य असून देखील आम्ही 'देशभक्त' बनून राष्ट्रभक्तीच्या  नावाखाली सर्रास पसरवत असतो. बरं आपण तर पाठवतोच पण इतरांना सुद्धा खरे देशभक्त असाल तर पुढे पाठवा अशी जणू धमकीच्याच स्वरात इतरांचे राष्ट्रप्रेम पडताळू इच्छितो. खरं तर राष्ट्रभक्तीच्या खोटे संदेश अग्रेषित (फॉरवर्ड) करणे म्हणजे केवळ मूर्खपणा असून तो राष्ट्रप्रेम नाहीच असे माझे ठाम मत असल्याने आणि केवळ संदेश पाठवून राष्ट्रभक्ती सिद्ध होत नसल्याने मी विचारू ईच्छितो कि "फक्त संदेश पाठवल्याने राष्ट्रभक्त होता येते का?"

कारण  खरं राष्ट्रप्रेम हे हृदयात असावं लागतं त्यासाठी संदेश पाठवण्याची आवश्यकता नसते. आणि संदेश पाठवून शुभेच्छा द्यायच्याच असतील तर त्यांची सत्यता पडताळून खात्री करणे हे सर्वाधिक अगत्याचे ठरते असे मला वाटते. 

तर म्हणायचं मुद्दा हा कि आम्ही एकिकडे बाळ-गोपाळांना राष्ट्रभक्तीचे बाळकडू पाजत असतो व दुसरीकडे त्यांच्याच डोळ्यासमोरील कर्मचारीवर्गाला, मोठ्या माणसांना राष्ट्रगीताच्या वेळी सावधान उभे राहण्यासाठी साधा ५२ सेकंदांचा अवधी नसतो! तर कुठून छोट्या विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखण्याचे संस्कार होणार? आणि मग ते तिरंगा ध्वज चिखलात फेकत वा पायाखाली तुडवत असतील वा राष्ट्रगीत सुरु असताना हलत असतील तर त्यांचं चुकतं तरी कुठे !! अर्थात याला आपण मोठेच सर्वस्वी जबाबदार आहोत! मग ते सुशिक्षित तरुण असतील, पालक , कर्मचारी, शिक्षक, प्राचार्य वा आणखी कुणी! आज भारतीयच तिरंग्यास पायदळी तुडवतात अन्यथा ईश्वर/अल्लाह न करो पण एक दिवस असा येईल कि कुणीही परकीय देशातून येईल व तिरंगा तुडवत जाईल; म्हणून आतातरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे... याकरिता सर्वप्रथम आपण स्वत:च अंतर्मनातून वेळ जाण्याअगोदर बदलले पाहिजे ...

अखेरीस मी एकच सांगू ईच्छितो कि सदर लेख लिहिण्यामागे माझा हेतू कूण्याही वैयक्तिक वा संघटित व्यक्ती, नोकरदार, नेता, मंत्री, व्यवसाय, न्यायालय, वाहीणी वा  पक्षाच्या भावना दुखावणे वा त्यांच्यावर टिका-टिप्पणी करणे हा मुळीच नाही... मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे एक भारतीय नागरिक म्हणून आदरपूर्वक सन्मानच करतो. तरी कुणाच्या भावनांना ठेच पोहचत असेल तर 'क्षमस्व!' हा आपणापर्यंत राष्ट्रीय प्रतिकांचं (विशेषत: प्लॅस्टीकच्या ध्वज व राष्ट्रगीताचा) १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सण 'स्वातंत्र्य दिन' साजरा केल्यानंतर प्रत्येकच वर्षी दिसणारं वास्तवदर्शी आणि तितकंच चिँताजनक अपमानास्पद वाटणारं चित्रण व्यक्त करण्यासाठी माझा 'लहान तोँडी बराच मोठा घास' घेतल्याप्रमाणे हा छोटासा लेखनप्रपंच ... सदर लेख वाचल्यामूळे एक जरी रस्त्यावर वा कडेला धूळ खात खितपत पडून असलेला तिरंगा सन्मानपुर्वक उचलला गेला किंवा एक जरी व्यक्ती राष्ट्रगीताचा सन्मान करू लागला तरी मी माझा हा इवलासा प्रयत्न सार्थक झाल्याचे समजेन ...!

२६ जानेवारी २०१७  रोजी म्हैसुली (ता. देवरी जि. गोंदिया ) येथे मी दिलेले भाषण ऐका 
जय~हिँद


स्त्रोत : NDTV

स्वातंत्र्यदिन ~ चिरायु होवो ..!

HAPPY INDENPENDENCE DAY

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!



-राजेश डी. हजारे (RDH)
-आमगाव (१५ ऑगस्ट, २०१३)
- ०७५८८८८७४०१ 

  1. अद्ययावत (Update): सदर लेख १५ ऑगष्ट २०१३ रोजी प्रसारित व २०१६ साली अद्ययावत लेख  15 ऑगस्ट - 'नावाचा' राष्ट्रीय सण (१ ) व 15 ऑगस्ट - 'नावाचा' राष्ट्रीय सण (२ ) वर आधारित आहे. 
  2. या लेखात २०१४ साली प्रसारित व अज्ञात  तंत्रज्ञानिक दोषामुळे निष्कासित लेख 'SMS  पाठवल्याने माणूस राष्ट्रप्रेमी होतो का?' चा सारांश आहे.  
  3. © सर्वाधिकार सुरक्षित |  राजेश डी. हजारे 

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com